Wednesday 22 April 2015

बबनराव पाचपुते : दुसरा नारायण राणे

 राजकीय कारकीर्द उभी रहायला अनेक वर्ष जावी लागतात. पण ती संपायला फारसा वेळ लागत नाही. छगन भुजबळ, नारायण राणे आणि बबनराव पाचपुते हि माणसं महाराष्ट्रातील माणसाला माहित नाही हे शक्य नाही. अत्यंत संधीसाधू . छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी मारली. आपल्याला शिवसेनेत मिळावं तेवढा महत्व मिळत नाही हे पहातच नारायण राणेंनी काँग्रेसची वाट धरली. बबनराव तर या दोघांपेक्षा थोर.

जनतापक्षापासून सुरवात करणाऱ्या बबनरावांनी तर हाताला लागेल तो पक्ष धरला. त्यांनी हाताशी धरलेले काही पक्ष मोडीत निघाले पण बबनरावांचं राजकारण टिकून राहिलं. वर्षामागून वर्षे गेली. दशकामागून दशके गेली. पण बबनराव पाचपुतेंची खुर्ची अढळ राहिली.

पण किती वर्ष लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणार. विधानसभेला सत्ता बदल होणार हे लक्षात येताच बबनरावांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतली. मोडी लाटेत आपले पाप धुऊन निघेल असे त्यांना वाटत होते. पण तसं झालं नाही. बबनरावांच्या पदरी पराभव पडला.

बबनराव पडणारच होते. कारण त्यांनी जनतेसाठी काय केलं ते सांगायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. खुप कशाला दौंड नगर रस्ता हि श्रीगोंदा तालुक्याची रक्तवाहिनी पण तीही त्यांनी कधी नीट ठेवली नाही. कार्यकर्त्यांचा केवळ वापर केला. दोन कारखान्याचे मालक असताना. वीसएक हजार शेतकऱ्यांच्या १० - १२ लाख टन उसाचे गाळप करत असताना बबनरावांच्या पदरी पराभव पडतो कारण त्यांनी कायम तोंडात साखरेची वडी ठेऊन जनतेला गृहीत धरण्याच काम केलं. आमदारकीला पराभव झालाच पण सहकारी सोसायट्या, दूधसंघ सुद्धा हातातुन सटकले. अजित दादांसारख्या मातब्बराला सुद्धा माळेगावसह दोन कारखान्यातली सत्ता गमवावी लागली. सोमेश्वर जीवाचा आटापिटा आणि हात मोकळा सोडून वाचवला.

बबनरावांना तर हात सुद्धा मोकळा सोडायची सवय नाही. कधी दिलंच नाही. फक्त मागत राहिले आणि घेत राहिले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जिंकुन थोडी बहुत लाज राखावी असा विचार त्यांनी केला. त्यासाठी एकेकाळच्या पालकमंत्र्यांनी, अनेक मंत्रीपद भूषविलेल्या बबनरावांनी सर्व ताकदीनिशी कारखान्याची निवडणूक लढविण्याचे ठरवले. आणि व्हायचे तेच झाले. वर्षानुवर्ष सत्ता भोगलेल्या, अनेक मंत्रिपद भूषवलेल्या बबनरावांच्या माथी दारूण पराभव आला. बबनराव पाचपुतेंचा नारायण राणे झाला.

आता नारायण राणेंचे राजकारण पुन्हा उभे रहाणे जसे शक्य नाही तसेच पाचपुतेंचे राजकारणही पुन्हा उभे रहाणे शक्य नाही. या सगळ्यातून उगवत्या नेत्यांनी धडा घ्यावा हे मात्र नक्की. नाहीतर येत्या काळात असेच एकामागून एक नारायण राणे होत रहातील.

सत्ता गेली , पदे गेली
हाती आले हो लाटणे.
जन्मा माझ्या आले कसे ? -
सदा टाळ हो कुटणे.

वारकरयाची हो होती
माझ्या अंगावर झुल
झुलीखाली भोंदुबाबा
कोणी उठविली हूल.

रूप झाकायचे खरे
किती केला आटापिटा
जनता लागली हो पाठी
हाती घेउनिया सोटा.

आता जाऊ कुठे कसा
आणि लपवू हो तोंड
हत्तीलाही जड झाली
हत्तीचीच सोंड.

येत जाता कुणी आता
मला मारतो हो टोला
पांडुरंगाने हि आता
दूर लोटले हो मला. 

विठुराया काय आता
मला जवळ घेईल ?
माझ्या हो पापाचा धनी
देव कशाला होईल ?

-विजय शेंडगे, पुणे



        






   
                             

15 comments:

  1. संपत घोडेगावकर22 April 2015 at 21:16

    सर तुम्ही मस्त जोडे मारलेत. पण या नेत्यांना कधी अक्कल येईल असे वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. संपतजी अभिप्रायाबद्दल आभार. राजकारण्यांना वठणीवर आणणं सर्वस्वी पुढाऱ्यांच्या हातात आहे. गरज आहे ती हजार दोन हजाराच्या मोहाला बळी न पडण्याची.

      Delete
  2. संगिता सरोदे22 April 2015 at 21:20

    कविता आणि लेख दोन्ही मस्त.

    ReplyDelete
    Replies
    1. संगीताजी अभिप्रायाबद्दल आभार. आता ब्लॉगला नियमित भेट द्याल हि अपेक्षा.

      Delete
  3. Replies
    1. चिंतामणीजी, अभिप्रायाबद्दल मनपुर्वक आभार.

      Delete
  4. या तीन शिलेदारांमध्ये आणखी एकाचे नाव असावे. रामदास आठवले. एवढे लिहिले की पुरे असे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. mannab अभिप्रायाबद्दल आभार. बर्याच दिवसांनी आपला अभिप्राय मिळाला. रामदास आठवले या पंक्तीला बसुच शकत नाहीत. कारण या दोघांनी काही काळ का असेना राजकारणात दबदबा निर्माण केला होता. पण अखेरीस आपल्याच हातांनी आपल्या पायावर धोंडा पडून घेतला. रामदास आठवलेंच राजकारण हे राजकारण नाहीच. दुसरा पर्याय नाही म्हणुन ते राजकारणात आहेत.

      Delete
  5. सुंदर लेख....

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete
  6. खुसखुशीत राजकीय...

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete
  7. छान लेख आहे

    ReplyDelete
    Replies
    1. संदीपजी, अभिप्रायाबद्दल आभार. तुम्ही माझ्या ब्लॉगला पहिल्यांदाच भेट दिलेली दिसते. आपले स्वागत. यापुढे आपल्या नियमित भेटीची आणि अभिप्रायाची अपेक्षा.

      Delete