Saturday 25 July 2015

अजित पवारांची नौटंकी

देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळण्याची अजुन कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भाजपला खिंडीत गाठण्यासाठी कॉंग्रेसच्या हाती अजुनही कोणता ठोस मुद्दा लागत नाही. ज्या मुद्द्याला ते हात घालतात त्याच्या जाळ्यात तेच अडकतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहुन
राष्ट्रवादी गेली अनेक दिवस गळा काढते आहे. धाय मोकलून रडते आहे. फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडते आहे. पण उपयोग काय ? शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वर्षभरापुर्वी सत्तेत आलेले फडणवीस सरकार आणि मोदी जबाबदार कसे ? या प्रश्नाला राष्ट्रवादीकडे उत्तर नाही. पंकजा मुंडेंच चिक्की प्रकरण हा एक मुद्दा विरोधकांच्या हाती लागला होता. पण त्याचेही त्यांना भांडवल करता आले नाही.   

भुजबळ चौकशीत अडकल्यामुळे त्यांचा आवाज बंद आहे. 

केवळ बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मुद्दा घेऊन जितेंद्र आव्हाड किती दिवस खिंड लढवणार ? शिवाय बाबासाहेबा पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला म्हणून सामान्य माणसाची काहीच तक्रार नाही. त्यामुळेच बाबासाहेबांचा पुरस्कार हे काही सत्ता बदलाचे कारण होऊ शकत नाही. 

काही तरी नवा फंडा शोधायला हवा म्हणुन परवा अजित पवारांनी धनगरी वेषात धनगरांच्या आरक्षणासाठी आंदोलन केले. पण अजित पवार यापुर्वी धनगरी वेषात का झळकले नाही ? पंधरा वर्षाची सत्ता असताना का नाही दिलं धनगरांना आरक्षण ? याला उत्तर काय ? 

धनगरांना आरक्षण भाजपच्या या काळातच सत्ता नक्की मिळेल याची शरद पवारांनाही जाणीव असणार. म्हणुनच ' झळकून तर घ्या' एकदा आंदोलन करा. म्हणजे उदया भाजपन धनगरांना आरक्षण दिलं तरी आम्ही आंदोलन केलं म्हणुन धनगरांना आरक्षण मिळालं असा दावा ठोकता येईल . ' अशी कानपिचकी शरद पवारांनी दिली असणार आणि अजित पवारांना धनगरी वेषात बोहल्यावर उभा केलं असणार.        

या सगळ्यामुळे केंद्रात कॉंग्रेसची जी अवस्था आहे तीच महाराष्ट्रात राष्ट्रवादीची. फरक एवढाच कि ज्याचं नाव घेऊन मिशीवर हात फिरवावा असा नेता केंद्रातल्या काँग्रेसकडे नाही. आणि शरद पवारांच्या रूपाने महाराष्ट्रापुरता का होईना पण राष्ट्रवादीकडे तसा नेता आहे. अर्थात हा समज राष्ट्रवादीच्या चांडाळ चौकडीचा. वास्तवात शरद पवारांच्या पुण्याईची गंगाजळी संपत आलेली आहे. 

केंद्रात काँग्रेस राहुल गांधींच्या चेहऱ्याकडे डोळे लाऊन बसली आहे. राष्ट्रीय नेतृत्व स्विकारण्याची ताकद राहुल गांधी यांच्याकडे नाही हे नुकतेच मतदान करायला निघालेल्या तरूणाईला कळतं आहे. पण गांधी घराण्याच्या पुण्याई खाली दबून गेलेल्या काँग्रेसच्या सगळ्यांनीच डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.

गांधी घराण्याची पुण्याई संपत आल्यामुळे केंद्रात काँग्रेसची जशी अवस्था झाली आहे तशीच अवस्था शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची होणार. कारण घोटाळे बहाद्दर आणि नौटंकीकार हि अजित पवारांची ओळख अजित पवारांना पुसुन टाकणे शक्य होणार नाही. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या आणि अजित पवारांच्या नौटंकीला जनता बळी पडणार नाही. हे वास्तव राष्ट्रवादीने स्विकारायला हवे. पण राजकारणात पाठ टेकली तरी हार मानत नाहीत. त्यामुळेच केंद्रात कॉंग्रेसची आणि राज्यात राष्ट्रवादीची पथनाट्ये चालुच रहाणार.                        

         

4 comments:

  1. Replies
    1. प्रमोदजी आपला अभिप्राय मिळाला कि नेहमीच आनंद होतो. अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
  2. kongres aani rashtrwadi samplyat jma aahe sir.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले अनुमान खरे ठरेल असे वाटते. प्रतिक्रियेबद्दल आभार.

      Delete