Friday 17 July 2015

बाई, बुद्धी आणि शिक्षण

( माफ करा हे सारं लिहिण्यामागे स्त्रियांना कमी लेखणं हा हेतू मुळीच नाही. मला आई आहे. बहिण आहे. बायको आहे. पण त्या सगळ्यात थोड्याफार फरकाने स्त्री मला अशीच जाणवते. तिचा दृष्टीकोन अधिक व्यापक व्हावा हाच हेतू. ) 
शिक्षणानं माणसाला शहाणपण येतं असं म्हणतात. पण माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती पाहिल्या कि या विधानावरचा माझा विश्वास उडून जातो. आणि मला शहाणपणाची सांगड संस्कारशी घालावीशी वाटते. झालं असं.
आमच्या सोसायटीत नव्यानंच रंगरंगोटीचं काम केलं होतं. नव्या नवरीला हळद लावावी आणि तिला बोहल्यावर उभं करावं तशा भिंती झकास वाटत होत्या.
भिंती नव्यानंच सजल्या होत्या. पावसाळा नुकताच सुरु झाला होता. बाहेर पाऊस पडत होता. सोसायटीच्या परिसरात आणि पार्किंगच्या पाण्यात खेळण्यात मुलं दंग झाली होती. काहींच्या हातात चिखलाचे गोळेही होते. मला कुणीतरी भिंतीवर चिखलाचे गोळे मारलेले दिसले. पावसाच्या मातकट पाण्यात भिजवलेले हाताचे पंजेही भिंतीवर मारलेले दिसले. मुलांवर रागवायला मला फारसं आवडत नाही. पण मुलांनी केलेली हि रंगरंगोटी मला आवडली नाही. त्या रंगकामाच आणि भिंती खराब झाल्याचंही मला फारसं काही वाटलं नसतं. पण मला हे सारं करण्यामागे त्या मुलाच्या निरागसतेपेक्षा विध्वंसकताच अधिक दिसून आली. सहाजिकच मी मुलांवर ओरडलो.
" कुणीं केलं हे सगळं ? " एक सात आठ वर्षाचा मुलगा पळाला. 
" काका त्या मयूरनं." सगळी मुलं एका सुरात.
" कुठ रहातो तो ? "मुलं धावतच एका रो हाऊसच्या दिशेनी गेली. मीही त्यांच्या पाठोपाठ.
सोसायटीतली असली तरी ही माणसं माझ्या फारशा परिचयाची नव्हती. पण तोंड ओळख होती. घरातले सगळेच सुशिक्षित. थोडे हायफाय. हाय क्लास. मी आवाज दिला तशी घराच्या खिडकीतून मुलाची आजी डोकावली." कोण आहे ?"
" जरा बाहेर या काकू."
मुलाच्या आजीबरोबर मुलाची आईही बाहेर आली. " काय झालं ? "
" तुमच्या मुलानं नव्यानं रंग दिलेल्या भिंतीवर कसे चिखलाचे गोळे मारलेत ते पहा जरा." मी.
" आमचा एकटाच मुलगा होता का तिथे ? " आजी.
" इतरही मुलं होती तिथ. पण सगळी मुलं तुमच्याच मुलाचं नाव सांगताहेत." मी.
" ठीक आहे. सांगितलंय त्यानं आम्हाला. त्याचे पप्पा आल्यावर मारतील त्याला. " मुलाची आई.
" तुम्ही तुमच्या मुलाला मारावं अशी इच्छा नाही माझी. मुलांना मारहाण करणं पटतही नाही मला. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगायला आलोय. " मी.
" आमच्याही फोर व्हिलरवर मुलांनी ओरखडे ओढलेत. आम्ही सांगायला गेलो तर त्याच्या आईनं ऐकूनही नाही घेतलं. " मुलाची आई.
" आहो, माझ्याही गाडीवर ओरखडे ओढलेत मुलांनी. मुलंच आहेत ती असं करणारच पण आपल्याला दिसल्यावर समजवायला नको त्यांना ? " मी.
" ते कळतंय आम्हाला. " आई आणि आजी एका सुरात.
त्यांचा सूरच असा होता कि फार तोंडी लागण्यात अर्थ नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि मी माघारी वळलो.
पण वाटलं. काय फरक पडलाय या बाईत शिक्षणामुळे. समोरची व्यक्ती आपल्याला काय सांगतेय ? ते सांगण्याचा तिचा हेतू काय ? हे का नाही समजावून घेवू शकली ती. मग तिच्या पेक्षा अक्षर ओळख नसलेली आमची बहिणाबाई किती थोर.
कितीही शिकली तरी बऱ्याचदा तिच्यातली स्त्री..........आई.........प्रेयसी.........बायको........सून........... सासू.........अशा अनेक छटा तिचं शिक्षण झाकोळून टाकतात. आणि मग तिच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. 
कालच गावाहुन आलो . तिथं माझी एक चुलती माझ्या शेजारच्या तिच्या जुन्या घरात येऊन रहात आहे असं दिसलं. आधी मुलाबरोबर राहायची. आता एकटीच रहाते. वय पंचाहत्तर ऐंशीच्या आसपास. सुरकुतलेली काया. ताठ कणा. पण तरीही थकुन गेलेली. सून, मुलगा, नातवंड अवघ्या शंभर फुटांवर. पण म्हातारी एकटीच. रात्रंदिवस. मीच एक दोन वेळा तिच्या जवळ जाऊन बसलो. विचारपुस केली. तर म्हणली, " ती लय शिया देती ? " 
म्हनलं ," कोण ? " 
तर म्हणाली ," सून माझी. शिया दिति आन हितं राहू नगं म्हणती. पोरगं म्हणलं , आई तू आपली जुन्या घरात रहा. तुला मी सांज सकाळची भाकर आणून देत जाईन. खा आणि पड आपली हितंच. म्हणून आले हितं. " 
मी आठ दिवस तिथं होतो. पण कुणी तिच्याकडे आपल्या गेल्याचे मला दिसले नाही. 
तासभर बसुन , " काही लागलं तर हाक मार, तंबाखू - बिंबाखू आणायची असेल तर सांगत जा." शंभर रुपये तिच्या पुढे धरत म्हणालो, " पैसे हवेत का ? "
तर म्हणाली, " पैसं नगं. हायीत माह्याकडं पाचसं. " 
गावाकडच्या घरोघरी हिच तऱ्हा. म्हाताऱ्यामाणसांना मुलं , सुना , नातवंड असुन नसल्यासारखे. म्हातारा - म्हातारी वेगळंच राहतात. वेगळंच करतात आणि वेगळंच खातात. दोघांचीच पंगत. लेक ना  नातवंड कुणीच नसतं पंक्तीला.           
आपल्यावरही कधी काळी हेच दिवस येणार आहेत हे का नाही कळत माणसांना. 


काही दिवसापुर्वी वर्तमानपत्रात एक सर्वैक्षण वाचलं. " ७८ % सुना करतात सासवांचा छळ. " का असं ?  म्हाताऱ्या माणसांना , वडिलधाऱ्यांना आपुलकीची वागणूक द्यावी एवढही शहाणपण शिक्षणानं स्त्रीला दिलं नाही का ?

अर्थात इतर २२ % सासवा सुनांचा छळ करत असतात असे म्हणायला जागा आहे. सवती - सवतींचं न पटणं सहाजिक आहे. पण आई - मुलीचं, सासू - सूनेचं, नंदा - भावजयांचा  का पटू नये ?      

   
   

  
          

8 comments:

  1. Ek stri asunhi mla aaple wichar yogych wattat.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गौरीजी. एक स्त्री असुनही आपणास माझा लेख आवडला त्यामुळे नक्कीच आनंद होतो आहे.

      Delete
  2. दिपक माने18 July 2015 at 14:38

    चांगला पण वादग्रस्त लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. वादग्रस्त असलं तरी हरकत नाही. आपल्यासारख्या रसिकांनी त्यला चांगला म्हणणे यातच सारे काही आले. आपल्या अभिप्रायाबद्दल मनपुर्वक आभार.

      Delete
  3. शिक्षणाने संस्कारापासुन फारकत घेतली आहे.कारण आहे स्पर्धा.सर्वांना यशस्वी व्हायचय.हे यश मोजलं जातं पैशात.मग पैसा सर्व म्हणता म्हणता सर्वस्व होतो.जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे स्त्री .पण कांही स्ञियांनाच हे समजेना.शिक्षाण घेतले म्हणजे पाठीमागची पिढी निव्वळच अडगळीची वाटते यांना.अर्थात सर्व अडाणी संस्कारी अन् सर्व शिकलेले वाईट असं ही नाही.खरं तर स्ञियांनीच सर्व सामाजिक संस्था टिकवून ठेवल्या आहेत.त्याग,सेवा,दया ही त्यांची मालकी हक्क पण अलीकडे शिक्षण घडवतय की बिघडवतय हेच कळेना.स्ञी मुक्तीच्या नावाखाली संस्कार मोडले जात आहेत.शिक्षण अपयशी ठरत आहे.आपला लेख छान वाटला सर.कोणीतरी बोललच पाहिजे .......

    ReplyDelete
    Replies
    1. जगदीशजी आपण बहुदा पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. ' रिमझिम पाऊस 'वर आपले मनापासुन स्वागत. आपण नाण्याच्या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकणारी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपले मनापासुन आभार, आपल्यासारख्या सारासार विचार करणाऱ्या रसिकांच्या अभिप्रायाची नेहमीच गरज असते.

      Delete
  4. Replies
    1. पण परिस्थिती बदलायला हे लेखन किती पाठबळ देतय कुणास ठाऊक ?

      Delete