Friday 15 January 2016

Indian Festival : मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ?

काल गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो. इकडून तिकडून थोडी माहिती गोळा केली. मनातल्या मनात काही ओळी आकाराला आल्या. एक भेटकार्ड तयार करून त्या त्यावर उतरवल्या. ते भेटकार्ड तुम्हाला मनापासून आवडेल अशी आशा आहे. 
बारा राशी असतात. हे आपल्याला माहित आहे. यातली प्रत्येक रास हि वेगवेगळ्या महिन्याला याप्रमाणे बारा महिन्याच्या बारा राशी असतात. ज्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. या नुसार खरे तर प्रत्येक महिन्याला संक्रांत येते. मग जानेवारी महिन्यातल्या संक्रांतीलाच एवढे महत्व का ? आणि याच संक्रांतीला मकरसंक्रांत का म्हणतात ?

आज सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणुन आजच्या संक्रांतीला मकर संक्रात म्हणतात. आजपासून उत्तरायण सुरु होते. सुर्य भारताच्या अधिकाधिक जवळ येऊ लागतो. त्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. 

अंधार कोणालाच आवडत नाही. तर प्रकाशाची प्रत्येकजण वाट पहात असतो. अंधार हे वाईटाचं तर प्रकाश हे चांगुलपणाचं प्रतिक मानलं जातं. ………. अंधार हे अधोगतीच तर प्रकाश हे प्रगतीच प्रतिक मानलं जातं………. अंधार अनिष्ट तर प्रकाश निष्ट.………. अंधार निराशा तर प्रकाश आशा………. अंधार म्हणजे चाचपडण………तर प्रकाश म्हणजे बागडणं. 

त्यामुळेच मकरसंक्रांत हा दिवस वाईट गोष्टींच्या निर्मूलनाचा तर चांगल्या गोष्टींच्या आगमनाचा दिवस मानलं जातो. दिवस मोठा झाल्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला अधिक उर्जा मिळू लागते. सृष्टी चैतन्याने भरून जाते. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल दिसू लागते. वठलेल्या झाडालाही हिरवे धुमारे फुटू लागतात. दिवस मोठा झाल्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला अधिक उर्जा मिळू लागते. आजपासून वाढणारा उन्हाचा चटका उदयाच्या पावसाची रुजवात करणार असतो. 

थोडक्यात उदयाच्या भाग्योदयाची सुरवात आजच्या मकर संक्रांतीपासून होणार असते. म्हणुन आजचा दिवस प्रत्येकाला तिळगुळ देऊन , नव्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देऊन साजरा केला जातो. 


2 comments: