Sunday 1 March 2015

Cricket : टिम इंडियाची धाव कुठपर्यंत ?

 इंग्लंडचा दौरा, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा त्यानंतरची इंग्लंड , ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातली तिरंगी  मालिका. काय पाहिलं आम्ही या दोन महिन्यात ? फक्त पराभव. कुचकामी गोलंदाजी. कागदावर पहाडासारखी वाटणारी पण

प्रत्यक्षात कोसळणारी फलंदाजी. ऑस्ट्रेलियात पोहचल्यापासून भारताला एकही विजय मिळवता आला नव्हता. ऑस्ट्रेलियात पोहचल्यापासून भारताला पहिला विजय मिळाला तो विश्वचषकाच्या अफगाणिस्तानच्या विरोधातील सराव सामन्यात. हे सारं पाहिल्यानंतर आम्ही आशा सोडून दिल्या होत्या. विश्वचषक जिंकणं तर सोडाच पण टीम इंडिया उपांत्य सामन्यापर्यंत पोहचेल हाही विश्वास उरला नव्हता. भारतीय फलंदाजीवरचा विश्वास अगदीच डळमळीत झाला नव्हता . पण भारतीय गोलंदाज कोणताही संघ पूर्णपणे बाद करू शकत नाहीत हे लक्षात आलं होतं. भारत खेळणारा सामना आपण पहाणारच होतो पण धडधडत्या काळजानं.

पण जादूची कांडी फिरावी तसं झालं. भारतानं पाकिस्तानविरुद्धचा सामना जग्गजेत्याच्या आवेशात जिंकला. आम्ही सुटकेचा श्वास सोडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सोपा नव्हता. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सगळ्याच आघाडयांवर भारतापेक्षा कितीतरी सरस असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना आपण जिंकणं शक्यच नव्हतं. पण भारतीय संघानं कमाल केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना नुसता जिंकलाच नाही तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडयांवर दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं. आता मात्र प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये चैतन्य संचारलय.

संयुक्त अरब अमिराती विरुद्धचा सामना आम्ही जिंकणारच होतो. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज संघांविरुद्ध कडवी लढत देणाऱ्या युएईचा संघ कडवी लढत देईल अशी अपेक्षा होती. पण भारताने क्रिकेटच्या अनिभिषिक्त सम्राटाच्या थाटात सामना खिशात घातला. आता युएईचा संघ दुबळा होता असं म्हणुन टीम इंडियाच्या कामगिरीला कुणी गालबोट लावू नये. 



आता टीम इंडिया आपल्या गटातला कोणताही सामना हरण्याची शक्यता उरलेली नाही. आता भारत उपांत्य सामन्यापर्यंत पोहचेलच पण विश्वचषक सुद्धा जिंकेल असा विश्वास वाटतोय. अर्थात ऑस्ट्रेलिया यातला एक अडथळा आहे. विश्वचषक जिंकायचाच असा टीम इंडियानं निर्धार केलेला असावा. आणि भारतीयांच्या निर्धारापुढे ऑस्ट्रेलियाचा टिकाव लागणार नाही असा मला विश्वास वाटतो.

भारतीय संघात एवढा बदल कसा झाला असावा ? याविषयी मी जेव्हा विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं जाईल तेव्हाच लिहिण. पण भारतीय संघानं विश्वचषक जिंकला तर ती धोनीला सर्वात मोठी भेट असेल. कारण धोनीचा हा बहुधा शेवटचाच वर्ल्डकप असणार आहे.

तेव्हा भारतीय संघाला शुभेच्छा देऊ आणि भारतीयांनी विश्वचषक उंचावलाय असे असे स्वप्न पाहु.    

4 comments:

  1. प्रमोद चव्हाण2 March 2015 at 19:21

    आपण अत्यंत योग्य मत मांडले आहे. भारतीय संघात एवढा कायापालट होईल असे स्वप्नातही वाटत नव्हते.

    ReplyDelete
    Replies

    1. आभार प्रमोदजी. आता भारतीयांच्या शुभेच्छा टीम इंडियाला विश्व चषकापर्यंत घेऊन जातील.

      Delete
  2. True content.

    ReplyDelete