Tuesday 26 May 2015

भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ का ?

 काही विषयांवर त्या त्या वेळीच लिहायला हवं हे मला मान्य आहे. पण जगण्याच्या रगाड्यात राहून जात. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच का दिला असेल या माणसाला हा पुरस्कार ? काय याचे कर्तुत्व ? दुसरं कुणी नव्हतंच का त्या पुरस्कारासाठी योग्य ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. आणि आज
अखेरीस मी त्या विषयावर लिहायला घेतले. कारण ज्ञानपीठ मिळाल्यानंतर काही ना काही वादग्रस्त विधाने करून कोसला नंतर अडगळीत पडलेले हे गृहस्थ सतत चर्चेत राहू लागले. मरता मरता ऑक्सिजन मिळाल्यानंतर देहात धुगधुगी यावी तसे नेमाडेंचे झाले.

मी नेमाडेंचा विरोधक नाही. पण आजतागायत मराठीतील तीन साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर आणि विं. दा. करंदीकर ह्या तिघांना हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला ' यांना हा पुरस्कार का दिला असेल ? ' असा प्रश्न कधीही पडला नाही. पण भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ देण्यात आले तेव्हा मात्र माझ्या मनात प्रश्नांचे काहुर उठले.

खरंतर नेमाडेंनी साहित्यविश्वाला काय दिले असा प्रश्न निर्माण करण्या इतका मी थोर नाही. परंतु मराठीवर निस्सीम प्रेम करणारा आणि मराठी साहित्याचा एक वाचक म्हणुन या विषयावर भाष्य करण्याचा मला नक्कीच अधिकार आहे.

' कोसला ' हि भालचंद्र नेमाडेंची एकमेव ओळख. भालचंद्र नेमाडेंच्या दुसऱ्या पुस्तकाचे नाव कोणत्याही सामान्य वाचकाला सांगता येणार नाही.

' कोसला ' नंतर ' बिढार ' , ' हूल ' , ' जरीला ' , ' झूल ' या कादंबऱ्या ' मेलडी ' , ' देखणी ' , हि काव्य संपदा तर ' ' टीकास्वयंवर ' , ' साहित्याची भाषा ' इत्यादी समीक्षा हि नेमाडेंची मराठी साहित्यातली भर.

मग या तुलनेत यादव कुठे कमी पडले ? कोणताही सामान्य वाचक यादवांच्या ग्रंथ संपदेतली चार सहा पुस्तकांची नवे सहज सांगेल. ' झोंबी ' पासुन ' काचवेल ' पर्यंत आत्मचरित्रे ' स्पर्श कमळे ' पासुन ' पाणभवरे ' पर्यंत ललित लेखन ' हिरवी माती ' पासुन ' माय लेकरं ' पर्यंत कविता ' गोतावळा ' पासून ' संतसूर्य तुकाराम ' पर्यंत कादंबऱ्या ' खळाळ ' पासून उखडलेली झाडे ' पर्यंत कथा संग्रह आणि कितीतरी समीक्षणात्मक ग्रथ. अशा जवळ जवळ ४० हून अधिक पुस्तकांनी आनंद यादवांनी मराठी साहित्य समृद्ध केले. आणि तरीही  ज्ञानपीठ पुरस्कार समितीला यादवांच्या नावाचा विसर पडावा ?

पुस्तके तर शिरीष कणेकरांनीही खुप लिहिली म्हणुन त्यांना आजवर कोणीही साहित्यिक म्हणून नावाजलेले नाही. आणि सामान्य वाचकालाही शिरीष कणेकरांची साहित्यिक उंची माहिती आहे. पण यादव ! यादवांना डावलून नेमाडेंना ज्ञानपीठ ? पण या विरोधात कोणी बोलणार नाही ? कारण खाजवुन अवधान आलेलं कुणालाच नको आहे.

बरं ! यादव नुसतेच साहित्यिक होते का ? नाही. ते नुसतेच साहित्यिक नव्हते तर ग्रामीण साहित्याची एक चळवळ त्यांनी उभी केली, नावारूपाला आणली आणि ग्रामीण साहित्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. ग्रामीण साहित्याचे अनेकांगी पदर रसिकांना उलडून दाखवले.


' भारतरत्न ' च्या निष्कर्षात सचिन तेंडुलकर बसत नसताना सचिन तेंडूलकरला भारत रत्न दिलाच ना. तसाच

भालचंद्र नेमाडेंनाही ज्ञानपिठ पुरस्कार दिला असे समजु या.

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले म्हणुन कुणाचे साहित्य श्रेष्ठ ठरत नाही तसेच ज्ञानपिठ पुरस्कार मिळाला म्हणुन नेमाडेंना मोठेपण मिळणार नाही.

ज्यांना तळी उचलुन धरायची आहे ते धरतीलच.  


No comments:

Post a Comment