Thursday 4 July 2019

खळाळत्या आयुष्याची धरण गाणी.

जे चांगलं त्यावर चांगलं लिहिताना मला शब्द कमी पडत नाहीत. परंतु आमच्या कवितेची स्तुतीच करा असा कुणाचा आग्रह असेल तर ते शक्य नाही. अलीकडे माझ्याहून थोर मीच अशीच प्रत्येक कवीची भावना असते त्यामुळे कुणावर टीका केली तर ती त्याला रुचत नाही. त्यामुळे अलीकडे लोकांना काय आवडेल खूप भान बाळगावे लागते. मीच नव्हे श्रीपाल सबनीस यांच्या सारखे जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या अध्यक्षिय भाषणात कसल्याही सुमार पुस्तकावर अतिशय भरभरून बोलतात.

पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी फार
कमी माणसं आयुष्यात भेटतात. काळे सर हे असेच माणूसपण जगणारे व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांचा 'धरणगाणी हा दुसरा काव्यसंग्रह हाती ठेवला. त्या काव्यसंग्रहाविषयी थोडंसं -

सखी सांगाती हे दीर्घकाव्य. पती पत्नीमधला संवाद हे त्या संग्रहाचं स्वरूप. पण खूप अप्रतिम. पतिपत्नीच्या नात्यातले कितीतरी तरंग त्यांच्या त्या संग्रहात उमटले आहेत. 'धरणगाणी' मधल्या कविता हे  त्यांच्या आयुष्यातले अनुभवच आहेत. त्या अनुभवांची पातळी वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, ईश्वरवादी आहे, आशावादी आहे. तसं तर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य अशाच स्वरूपाच्या अनुभवांचा साचा असतो. परंतु सामान्य माणसाला या अनुभवांची कविता नाही करता येत. त्यासाठी विशेष दैवी देणगी लाभावी लागते. तशी दैवी देणगी काळे सरांना लाभलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील साध्या साध्या प्रसंगांची ते सर्वव्यापी कविता करू शकले.

धरणगाणी हे शिर्षक धारण केलेल्या या काव्यसंग्रहात प्रत्येक कविता धरण आणि त्यासंबंधित भाषेतच व्यक्त झाली आहे. त्यामुळेच धरण, गॉर्ज पोर्शन ( धारण बांधण्यासाठी योग्य जागा ) , भराव, सांडवा, कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्या, पाट, लाभक्षेत्र असे कितीतरी कवितेला अनोळखी असलेले शब्द या संग्रहात आढळतात. सवयीचे नसलेले हे शब्द आपल्या मनाला कुठेही खटकत नाहीत. कारण काळे सरांनी अत्यंत कलाकुरीने या शब्दांचा वापर केला आहे.

आपण कविता लिहावी. रसिकांना, समीक्षकांना त्यातून जे अर्थ काढायचे असतील ते काढू द्यावेत असा एक प्रवाह आहे. हे म्हणजे आंधळ्याच्या हाती देऊन त्याला हे काय आहे असे विचण्यासारखे आहे असे माझे मत आहे. मग कोणी कानाला सूप म्हणते, कोणी पायाला खांब म्हणते, कोणी शेपटाला झाडू म्हणते. त्यापेक्षा आपण त्यांना कशाला काय म्हणावे हे सांगितले तर काय हरकत आहे. असे मला वाटते. त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक कवितेच्या आधी एक निवेदन देतो. त्यातून मला काय सांगायचे आहे ते कथन करतो. त्यामुळे मी आणि रसिक एका पातळीवर येतो आणि मला हवी तशी माझी कविता त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात पोहचते.

काळे सरांनाही असेच वाटत असावे म्हणूनच प्रत्येक कवितेच्या आधी ते निवेदन करतात. कधी ते एका ओळीच असतं तर दहा वीस ओळींचं. पण ते निवेदन वाचून आपण कवितेच्या मनात उतरतो तेव्हा कविता आपल्या मनाचा अधिक चांगल्याप्रकारे ठाव घेते. सर्वात महत्वाचे म्हणजे नुकताच त्यांच्या या काव्यसंग्रहातील 'उतराई' या कवितेचा मराठवाडा विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. हा काव्यसंग्रह वाचताना मनात वेगळे आनंदतरंग उमटतात हे नक्कीच.

No comments:

Post a Comment