Sunday 14 December 2014

BJP, Shivsena : शिवसेना हरली की …. ?

मी माझ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या आयुष्यात आणि राजकारण कळु लागल्यापासून म्हणजे साधारणतः मागच्या वीस पंचवीस वर्षात एखाद्या विरोधी पक्षाने पंधरा दिवसात विरोधी पक्षाची भुमिका सोडुन सत्तेत सहभागी होण्याची हि पहिली वेळ असावी. सत्तेची हाव कोणाला या प्रश्नावर अनेकांनी तावातावाने मते व्यक्त केली. पण आता सत्तेची हाव नेमकी कोणाला ? राजकीय पटलावरची परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या मित्र पक्षाला सोबत घेणाऱ्या भाजपाला कि शड्डू ठोकून ' आम्ही विरोधी पक्षातच ' असं सांगुन, पंधरा दिवसात सत्तेत सहभागी होणाऱ्या शिवसेनेला ? हे सुज्ञ वाचकांनी ठरवावे. ' भाजपानं मात्र आम्ही शिवसेनेला सत्ते घेणारच नाही. ' असे विधान केल्याचे स्मरत नाही. 
परंतु आज सत्तेची हाव कोणाला ? अथवा शिवसेना हारली किमिशन सत्ता
जिंकली ? हे असले प्रश्न अधिक महत्वाचे नाहीत. अनेकजण शिवसेना - भाजपा एकत्र येतील कि नाही याचा खल करत असताना मी मात्र माझ्या  ' शिवसेनेचा आणखी एक पराभव '    ' काय आहे भाजपाच्या मनात ' आणि ' मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे ' या तिन्ही लेखात म्हणाल्याप्रमाणे भाजपा - शिवसेना एकत्र आले  आहेत. रसिक वाचकांनी हे तिन्ही लेख पुन्हा एकदा वाचून संदर्भ घायला हरकत नाही. 
आज शिवसेनेचे अनेक समर्थक शिवसेनेला दुषणे देत आहेत. पण उशिरी का होईना उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय भाजपा आणि शिवसेना यांच्या हिताचा आहेच परंतु महाराष्ट्राच्या हिताचा सुद्धा आहे. कारण सत्तेला सोकावलेल्या विरोधकांची भुमिका राज्याच्या अथवा राष्ट्राच्या हिताची असण्याची शक्यता कमीच असते. त्यांचा कार्यक्रम एकच सत्ताधारी पक्षावर टीका करायची. मग त्यांना त्यासाठी कुठलाही विषय चालतो. अगदी जवखेड्यातल्या हत्याकांडाचाही. 
त्यामुळेच ' भाजपा - शिवसेना ' यांनी एकत्र येण्याचा जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे. ' असे मत मी व्यक्त केले आहे. परंतु यापुढे शिवसेनेने मनात कुठलंही क्लिमिष न ठेवता भाजपाला मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे. इतकंच नव्हे तर येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकात शिवसेनेने थोडी पडती बाजु घेतली तरी चालेल. कारण त्यामुळे भाजपानं देशभरात ज्या रितीने शतप्रतिशत भाजपा अशी घोषणा करून त्या दिशेने वाटचाल केली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शतप्रतिशत युती असं चित्रं साकारणं शक्य होणार आहे. 
येत्या पाच वर्षात संपुर्ण महाराष्ट्रात युतीचा दबदबा निर्माण करायचा असेल तर शिवसेनेने उगाच करायचा म्हणुन विरोध करू नये. जिथे गरज आहे तिथं भाजपाला नमतं घ्यायला जरूर भाग पडावं पण मिडियात त्याचा बोभाटा करू नये. महाराष्ट्रात शिवसेनेची अवस्था मनसेसारखी कधीच होणार नाही. त्यांना हवा असेलेला सन्मानही मिळेल. पण सबुरीनं घेतलं तर. 
भाजपानं किती सौजन्य दाखवलं यावरही थोडं लिहायला हवं.  मी माझ्या ' काय आहे भाजपाच्या मनात ' या लेखात लिहिल्याप्रमाणे भाजपानं शिवसेनेला अधिकाधिक ५ ते ६ मंत्रीपदं द्यायला हवी होती. त्यापेक्षा अधिक मंत्रीपदं देण्याची भाजपची मानसिकता नव्हती पण उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद यासाठी अडून बसलेल्या शिवसेनेला थोडीथीडकी तब्बल १२ मंत्रीपदं दिली. त्यांच्या ६३ आमदारांनामागे १२ मंत्रिपदे म्हणजेच ५ आमदारांमागे एक मंत्रीपद असे प्रमाण पडते तर आज भाजपाकडे केवळ १८  मंत्रिपदे आहेत. १२३ आमदारांनामागे १८ मंत्रिपदे म्हणजेच ७ आमदारांमागे एक मंत्रीपद असे प्रमाण पडते. आज महाराष्ट्राच हित लक्षात घेऊन भाजपानं पडती बाजु स्विकारली आहे. परंतु हा भाजपाचा पराभव अथवा शिवसेनेचा विजय नव्हे. विजय झालाच असे तर मतदारांचा झाला आहे.   
त्यामुळेच मागील पाच महिन्यात शिवसेनेने जो थयथयाट केला आहे तसा थयथयाट करू नये. कारण एकेकाळी देशभरात केवळ दोन खासदार असणाऱ्या बीजेपीनं आज देशात स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. चार आमदार असणाऱ्या हरियाणात ४७ आमदारांना विजयी करून निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. तशीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणे भाजपाला फारसे जड जाणार नाही.       

4 comments:

  1. शेवटी शिवसेनेच्या पाया पडाव्याच लागल्या.

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया निनावी प्रतिक्रिया देवू नयेत. कोण कुणाच्या पाया पडलं हे महत्वाचं नाही. शेवट गोड झाला हे महत्वाचं.
      ReplyDelete

      Delete
  2. कमळाबाई आली का पदर पसरुन.

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया निनावी प्रतिक्रिया देवू नयेत. भाजपानं पदर पसरला कि उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने माघार घेतली हे महत्वाचं नाही जे झालं त्यात महाराष्ट्राचं हित आहे हे नक्की.

      Delete