Friday 10 July 2015

म्हणे विठ्ठल मला

या लेखातल्या सुरवातीच्या चित्राची संकल्पना आणि निर्मिती सर्वस्वी माझी आहे. वारकऱ्याच्या मुखातून निघणारा, मातीवर उमटलेला पांडुरंग S S S S पांडुरंग गजर मोठा होत होत आभाळा जाऊन भिडतो छे छे आभाळा नव्हे प्रत्यक्ष पांडुरंगाला जाऊन भिडतो. अशी हि संकल्पना. कविता आणि लेखही तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. 


काल देहूतून निघालेली पालखी. आज पिंपरी चिंचवड परिसरात पोहोचली. सकाळी सहा वाजता आम्ही पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या जवळील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याजवळ हजर झालो. पण तिथुन आमच्या आधीपासून वारकऱ्यांची रीघ लागलेली होती. ताल मृदुंगाच्या गजरात ठेक्यात पावले टाकत होती. 

तिथं धनगर समाजाच्यावतीने वारकऱ्यांना राजगिऱ्याचे लाडु आणि पाणी वाटप करण्यात येणार होते. आमच्या भगिनी नगरसेविका आशाताई शेंडगे, पालिकेचे अभियंता भोजने आणि धनगर समजाचे अनेक जेष्ठ श्रेष्ठ मानकरी हजर होते. 

आमचे बंधू संजय शेंडगे कासारवाडीतल्या पिठलं - भाकरीच्या नियोजनात दंग होते. 

आमचं वाटप सुरु झालं आणि मला - मला करत हात पुढं करणाऱ्यांचा एकच कल्लोळ उडाला. लाडू आणि पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी एकाच झुंबड उडाली. 

यातले काही प्रसंग असे होते कि वाटायचं - 

" काय करायचं जगुन ?" 

माणसांच्या किती तऱ्हा पहिल्या आपण ? प्रत्येकजण स्वार्थाच्या, मोहाच्या जाळ्यात सापडलेला. या माणसांच्या जगात वावरण्यापेक्षा आपण स्वतःला पांडुरंगाच्या चरणी का झोकून देवू नये ? तोच तर आपला पिता. त्याच्या कुशीत स्वतःला झोकून द्यावं........तहानुला होऊन त्याच्या पुढ्यात दुडदुडावं.

माणसं नाही करत एकमेकांवर निख्खळ प्रेम. माणसाला फक्त जगण्याची ओढ. दोन वेळच्या अन्नाची चिंता. सगळी संपत्ती इथच सोडून जावी लागते हे माहित असूनही त्याच संपत्तीची आस. नकोच हि माणसं.
त्यापेक्षा आपण ज्ञानदेवांची पताका खांद्यावर घेऊ. विठ्ठलाच्या पायाशी जाऊ. त्याच्या चरणी लोळण घेऊ. तोच आपला मायबाप. तो लेकुरवाळा. जो जनीला दळण दळू लागला...........जो गोऱ्याला चिखल तुडवू लागला.......जो सावत्याच्या रानातली भाजीपाला झाला तो विठोबा आपली भक्ती पाहून आपल्याला उचलून घेईल. आणि आपण त्याच्या खांद्यावर बसून सारा ब्रम्हांड पाहू.
असा विचार करून मी विठ्लाला मला त्याच्या पायाशी जागा देण्याची विनंती करतो. पण त्याच्या पायाशी जागा मिळते ती पुण्यवंताला. आणि आपण पुण्यवंत कधी ठरतो, तर जेव्हा त्या विधात्यानं जी कर्म करण्यासाठी करण्यासाठी आपल्या रुपानं या भूतलावर जन्म घेतलाय ती कर्म पार पडल्यावर.
सहाजिकच त्यानं नेमून दिलेली कर्म माझ्या हातून अद्याप पूर्ण झाली नाहीत आणि म्हणूनच माझ्या गाठीला पुरेशी पुण्याई जमा झालेली नाही. हेच विठ्ठल मला सांगतोय या कवितेतून -

म्हणे विठ्ठल मला 


केली पंढरीची वारी 
झाली पायाची पंढरी 
केले पुण्य मी कोणते 
मला भेटला हो हरी. 

नाद टाळ चिंपळ्याचा
हरीनामाचा गजर 
वाट सरते सरते 
आणि सरतो प्रहर.  

असे सरती प्रहर 
येते विठ्ठलाचे गाव 
मला वाटते लागली 
माझी तीराला हो नाव.  

आता विठ्ठल चरणी 
वाटे बसून रहावे 
नाम विठ्ठलाचे घ्यावे 
आणि वैकुंठा निघावे. 

म्हणे विठ्ठल मला , " बा , 
नको इतुकी रे घाई 
थोडी गाठीला जमू दे 
तुझ्या आणखी पुण्याई. "   

पण यातला सुरवातीचा " काय करायचं जगुन ?" हा विचार काही क्षणांपुरता. नंतर मात्र मी वारीची भव्यता पाहून हरखुन जातो. एका विठुरायाच्या श्रद्धेपोटी पायपीट करणारा हा जनसागर पाहून माझ्या डोळ्यात अश्रू उभे रहातात. " ज्ञानोबा , माउली … तुकाराम " हा गजर ऐकून कान तृप्त होतात. आणि मी पुढच्या वर्षी वारकरी होऊन हरवून जाण्याचा निर्णय घेतो. वारीचा वारकरी होणं हे कुणा एऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी सुद्धा पुण्य पदराशी असायला हवं. कारण वारीचे भिकारी बरेच असतात पण वारीचे वारकरी मात्र मोजकेच असतात. मला वारीचा वारकरी व्हायचंय वारीचा भिकारी नाही .            
  





6 comments:

  1. Replies
    1. आभार मित्रा. पण आपण आपले नाव का नाही कळविलेत ?

      Delete
  2. मनीषा जोशी18 July 2015 at 14:42

    म्हणे विठ्ठल मला , " बा ,
    नको इतुकी रे घाई
    थोडी गाठीला जमू दे
    तुझ्या आणखी पुण्याई. "

    अप्रतिम कल्पना विजयजी.

    ReplyDelete
    Replies
    1. मनीषाजी, आपल्या अभिप्रायाबद्दल मनपुर्वक आभार. आपण माझ्या फेसबुक वर्तुळातील तर नव्हे.

      Delete
  3. कविता छान आहे
    आणि तुम्ही प्रत्येक पुणेकरांच्या मनातील विचार व्यक्त केले आहेत
    कारण तो दरवर्षी वारीत आसेच विचार करतो-

    भव्यता पाहून हरखुन जातो.
    एका विठुरायाच्या श्रद्धे पोटी पायपीट करणारा
    हा जनसागर पाहून माझ्या डोळ्यात अश्रू उभे रहातात.
    " ज्ञानोबा , माउली … तुकाराम " हा गजर ऐकून कान तृप्त होतात.
    आणि मी पुढच्या वर्षी वारकरी होऊन हरवून जाण्याचा निर्णय घेतो.
    वारीचा वारकरी होणं हे कुणा एऱ्या गबाळ्याचं काम नव्हे.
    त्यासाठी सुद्धा पुण्य पदराशी असायला हवं.
    कारण वारीचे भिकारी बरेच असतात पण
    वारीचे वारकरी मात्र मोजकेच असतात.
    मला वारीचा वारकरी व्हायचंय.            

    ReplyDelete
    Replies
    1. रमेशजी, आपल्यासारख्या रसिकांची प्रतिक्रिया मिळाली कि खुप छान वाटते.

      आपण माझा जो परिच्छेद अवतरण केलात ते सारे मलासुद्धा लागू आहे. कारण मी स्वतःही गेली काही वर्ष वारीचा वारकरी व्हायचे मनसुबे रचतो आहे. पण जाणे होत नाही. म्हणुनच माझ्या पदरी त्यासाठी आवश्यक असणारे पुण्य झाले नसेल असे विचार मनात आले.

      यावर्षी अजुनतरी पुरेसा पाऊस झाला नाही. तो झाला तरच पुढ्या वर्षी वारकरी व्हायचे नक्की केले आहे. पाहू की होते ते.

      Delete