Thursday 27 August 2015

माती विकता येत नाही

तुम्ही म्हणाल," काय हे सारखे शेतकऱ्यांविषयी आणि राजकारणाविषयी लिहिताहेत ? यांच्या पोतडीतल्या प्रेम कविता संपल्या काय ? "
नाही मित्रांनो माझ्याकडच्या प्रेम कविता संपल्या नाहीत. प्रेम कविता आहेत , सामाजिक कविता आहेत , मधेच एक पावसाची वाट पहात असताना लिहिलेली , 

" या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा " अशी विठू माऊली घातलेली साद आहे . मागे मीच " शेतकऱ्यांच्या आत्महत्या : वास्तव कि रंगकाम " हा लेख लिहिला होता. पण स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या कोणीही त्या लेखाला प्रतुत्तर दिले नाही. पण मी शेतकऱ्यांचा वैरी नाही. त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो आहे. माझी परीने मी शेतकर्यांची बाजू त्यांच्यासमोर मांडतो आहे. पण आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जे आपल्यासमोर वाढून ठेवले आहे ते निस्तरणे फार सोपे नाही त्यासाठी वेळ जावा लागणार आहे.        
शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मी खूप जवळून पहातो आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला शेतकरी जेवढा कारणीभूत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आमचं शासन कारणभूत आहे. शेतकऱ्यांना हवी तेव्हा वीज द्यायची नाही. त्याला मुबलक खतं द्यायची नाहीत. त्याची सबसिडी काढून घ्यायची. त्याच्या शेतमालाला भाव द्यायचा नाही. सहकारानं फायदा कुणाचा झाला असेल तर राजकीय पुढाऱ्यांचा....दलालांचा.....व्यापाऱ्यांचा.
शेतकरी मारतोच आपला आहे कष्ट करून. कितीही कष्ट केले तरी पोटापुरतंच मिळतं आहे हे पाहून शेतकऱ्याचीही कष्ट करण्याची भावना मरून गेली आहे.
दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला दुग्ध व्यवसायाचीही जोड दिली. पण भाव मात्र शासनाच्या ताब्यात. मला आठवतंय लहानपणी तीसऐक वर्षापूर्वी मी जेव्हा मी दुध आणायला जायचो तेव्हा काचेच्या बाटलीतून महाराष्ट्र शासनाच्या दुध केंद्रातून दुध मिळायचं. दुधाच्या बाटलीचं झाकण उघडलं कि झाकणाच्या आतून मलंईचा थर मिळायचा आणि आम्ही एखाद्या सराईत बोक्याप्रमाणे ते झाकण चाटून पुसून साफ करायचो. पण आता शासकीय डेअरीपासून सगळेच दुधातले सगळेच पौष्टिक घटक काढून घेतात. आणि ग्राहकाच्या हाती केवळ पांढर पाणी देतात. दुधातून काढलेल्या मलईपासून पुन्हा श्रीखंड, पनीर, चक्का, तूप, खवा असे वेगवेगळे पदार्थ तयार करून विकतात. श्रीखंडाचा भाव आहे १५० रुपय्र किलो, तूप २५० रुपये किलो, पनीर १०० रुपये किलो, सुगंधी दुध ८० रुपये लिटर................आणि शेतकऱ्याच्या पदरी पडतात लिटर मागे फक्त २० रुपये. मान्य या पुढच्या सगळ्या प्रक्रियांना खूप खर्च येतो. पण हेही तेवढंच खरं आहे कि ही मंडळी ५० ते ६० % नफा पदरी पडून घेतात.
एक गाय महिन्याला साधारणतः ६००० रुपये किमतीचं दुध देते. पण तिचा एका महिन्याचा देखभालीचा खर्च असतो ५००० रुपये. दुखलं खुपलं, दवापाणी एखादं जनावर दगावणं हे आणखी वेगळंच. शिवाय वर्षातून ती केवळ ७ महिनेच दुध देवू शकते. म्हणजे बाकीचे ५ महिने तिला स्वखर्चानं सांभाळाव लागतं.
कसं करायचं शेतकऱ्यानं ?
पण बाकी कुणाचं काय दुखतंय हो ? आमचे पुढारी, दलाल, सहकार खात्यातले अधिकारी सगळे टेचात. म्हणून मी माझ्या
कवितेत म्हणलंय -
दावणीच्या दुभतीला सहकाराचं टोणग पेलं.
पटतंय ना माझं म्हणणं !

4 comments:

  1. आभार विशालजी.

    ReplyDelete
  2. Replies
    1. पंकजजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete