Friday 7 June 2019

दैनिक प्रभात : कोंबड्याची बांग



कोंबड्यानं बांग दिली 
मला गं बाई जागं आली 
सुपात जोंधळ घोळीते 
जात्याव दळण दळिते....

हे गाणं माहित नाही अशी व्यक्ती अभावानेच सापडेल. पण आता कोंबडा, त्याचं आरवणं, कोंबड्याच्या आरवण्यानुसार येणारी जाग, जात्यावरच्या दळणं सगळं काही कालबाह्य झालं आहे. कोंबड्याची बांग. त्यानंतर झुंजूमुंजु होणाऱ्या दिशा. पूर्वेला दिसणारी तांबडी छटा. त्या मागोमाग उगवणारा सूर्य. अंगावर घ्यावीशी वाटणारी रेशीम किरणं. हे सगळं पाहणारे डोळे आता दिसत नाहीत कुठे. उठतात. मनात अविचारांचा कचरा ठेवून देह स्वच्छ करतात. कार्यालयाची वाट धरतात. नाकासमोर बघून चालतात. ऑफिसात पोहचले कि डोळे संगणकात कैद होतात. कान यंत्राच्या खडखडाटात हरवून जातात. संध्याकाळी मलूल झालेल्या किरणांची सुद्धा जाणीव होत नाही त्यांना. अंधार पडतो. रस्त्यावर दिवे लागतात. आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात डोळे घराची वाट शोधतात. घरट्यात परतात. ताटाकडे बघत दोन घास पोटात ढकलतात. पापण्यांची चादर ओढून झोपून जातात.

काही डोळे सूर्य हातभर वर येऊस्तोवर झोपून राहतात. सूर्य डोळे वटारून त्यांच्याकडे पहात असतो. पण त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. नऊ वाजतात. दहा वाजतात. तरी डोळे पापण्यांचं पांघरून ओढून पडून राहतात. कुठून आवाज आले, झोपमोड झाली तर कुरकुर करतात. मोबाईलचे गजर बंद केले जातात. शहरात सिमेंटची खुराडी आहेत. त्या खुराड्यात कोंबडे नाहीत माणसं आहेत. खुराड्यातल्या या माणसांना जाग आल्यावर कोंबड्याची बांग. पाखरांचे किलबिलाट कानावर पडावेसे वाटतात. त्यासाठी मोबाईलवर गजर लावताना मनासारखी रिंगटोन निवडली जाते. गजराच्या वेळेला कधी पाखरांचा किलबिलाट ऐकू येतो. तर कधी कोंबड्याची बांग. पण सगळं काही अनैर्सगिक. पाखरांचा तो चिवचिवाट किलबिलाट पाखरांच्या चोचीतून नव्हे मोबाईलच्या गळ्यातून उमटलेला असतो. कोंबड्याची बांग देणारा कोंबडा नसतोच अवतीभवती गजराची रिंग टोन हुबेहूब तसा आवाज काढते.

हे सगळं लिहिण्याला तसंच कारण घडलं. नुकतीच ‘दैनिक प्रभात’मध्ये बातमी वाचली. ‘महिलेची कोंबड्याविरुद्ध तक्रार’ असाच मथळा. एका महिलेने परिसरात असणाऱ्या कोंबड्याच्या आवाजामुळे झोपमोड झाली म्हणून पोलिसात तक्रार केली. अशा रीतीने झोपमोड झालेल्या महिलेच्या समोर कोणी जातं नेऊन ठेवलं आणि जात्यावरच्या ओव्या म्हणत दळण दळायला सांगितलं तर ती महिला काय करेल याची कल्पना न केलेलीच बरी. मला आणखी एक प्रश्न पडलाय. यात दोष कुणाचा? कोंबड्याचा कि कोंबड्याच्या मालकिणीचा कि कोंबड्याला आरवण्यासाठी गळा देणाऱ्या परमेश्वराचा कि त्या कोंबड्याच्या अधिक्षेत्रात रहिवास करणाऱ्या त्या महिलेचा? कुठं राहायचं हा त्या महिलेचा अधिकार असेल तर कधी आणि किती तीव्रतेने बांग द्यायची हा देखील त्या कोंबड्याच्या अधिकार नाही का? कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे? पशुपक्षांनी, प्राणिमात्रांनी व्यक्त व्हायचंच नाही का? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली तर आम्ही दंड थोपटून त्याला आव्हान देतो. न्यायालयाचे दरवाजे ठोठवतो. मग आता कोंबड्याने सुद्धा पंख थोपटून आव्हान द्यायचे का? न्याय मागायला कोणत्या न्यायालयात जायचे?

हि बातमी आनंददायी नक्कीच नाही. चिंताजनक आहे. माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे. नात्यागोत्यांची, पै-पाहुण्याची वीण उसवत चालली आहे. निसर्ग माणसाला हवा आहे. पण केवळ सुटी पुरता हवा आहे. त्याला हवा असेल तेव्हाच हवा आहे. त्याला जसा हवा तसाच हवा आहे. माणसाला उन्हाळा सोसत नाही तेव्हा तो घराबाहेर पडत नाही. घरातही पंखा लावून बसतो. कुलर लावून बसतो. पावसाळा नको असेल तर डोक्यावर छत्री धरतो. ‘कुठं रोज येतो पाऊस. भिजू या आज’ असं नाही म्हणत. हिवाळा वाढला कि उबदार कपडे घालतो. शेकोटी करून गारठ्याला भीती दाखवतो. तो फिरायला जाईल तेव्हा पाऊस पडावा अशी त्याची अपेक्षा असते. हिरवा निसर्ग पहायला त्याला आवडत पण निसर्ग हिरवा रहावा म्हणून तो काहीच करत नाही. जंगलातले वाघ सिंह माणसांच्या घरापर्यंत आले. माणसावर हल्ले करू लागले. वाघोबांची दहशत आहे. माणूस त्यांना घाबरतो. कारण त्याच्या मानेवर सूरी फिरविण्याची हिंमत नाही माणसात. म्हणून त्याची तक्रार घेऊन कोणी पोलिसात जात नाही. पण कोंबड्याचं काय? वाघाच्या डरकाळीची भीती वाटते. कोंबड्याच्या बांगेला कोण भीक घालतो?

पण खरंतर कोणी कोणाच्या मनाप्रमाणे वागायला हवं? कोणी कोणाला सांभाळून घ्यायला हवं? निसर्ग आहे म्हणून आमचं अस्तिव आहे? कि आम्ही आहोत म्हणून निसर्ग आहे. माणूस हि गरज नाहीच निसर्गाची? माणसालाच निसर्गाची गरज आहे. भगभगत्या उन्हाळ्यात आपण वाटचाल करत असतो. सावलीची गरज भासते. आपण मोठ्या आशेने झाडाचा घेऊ पाहतो. नेमकी त्याच वेळी त्याची सावली काढून घेतली तर काय होईल? किती राग येईल आपल्याला? कोणाला त्रास होईल? माणसालाच ना? रखरखत्या वाळवंटात तहान लागते तेव्हा खिशातल्या पैशाचा उपयोग नाही होत आणि मिळविलेले ज्ञान सुद्धा कामी नाही येत. पाण्याचा झराच शोधावा लागतो.

दुसऱ्याच्या भावनेचा विचार मुळीच करत नाही माणूस. आम्हाला कोंबड्याची बांग त्रासदायक वाटते. पण आमचे उत्सव मात्र आम्ही स्पिकरच्या भिंती रचून साजरे करतो. दुसऱ्याच्या कानाचे दडे बसले तरी त्याची पर्वा नसते आम्हाला. वेळ आलीच तर माणूस माणसाला सहन करेल. पण निर्सगाने मात्र माणसाला हवे तसेच वागायला हवे. 'नाच रे मोरा' म्हटले कि मोराने नाचायला हवे. 'ये रे ये रे पावसा' म्हटले कि पावसाने यायला हवे. आभाळाने पाऊस दिला नाही. झाडाने सावली दिली नाही. वेलींनी फुले दिली नाही, गव्हाच्या ओंब्याला गहूच आले नाही तर काय करेल माणूस? कोंबड्याने बांग दिली नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही. पण म्हणून त्याचा गळा आवळण्याचा आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला माणसाला?

No comments:

Post a Comment