Monday 1 December 2014

Marathi Kavita : काळ्या आईचीच पोरं

माझ्या राजकीय लेखांवर भरभरून प्रतिक्रिया देणारे रसिक या कवितेला किती प्रतिक्रिया देताहेत हे मला पहायचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरभरून बोलणारी मंडळी या शेतकऱ्यांच्या विषयी लिहिलेल्या कवितेवर काय बोलतात ते मला पहायचे आहे. कारण कुणी कितीही म्हणाले तरी
शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतकऱ्यांचेच आहेत. त्यांच्या अडचणी सोडवणारे कुणीच नाही. विरोधो पक्ष फक्त भांडवल करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे. उदयापासून कांदा ५० रुपये किलो आणि मेथीची गड्डी १५ रुपयाला मिळू लागली तर हे विरोधकच महागाई वाढली म्हणुन बोंब ठोकणार. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे असा सूर धरायचा आणि शेतकऱ्याला भाव मिळाला तर महागाई वाढली अशी बोंब ठोकायची. आज सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यात भाजपानं कांदा ५० रुपये किलो होऊ दिला नाही तसेच शेतकऱ्याच्या एक किलो कांद्याला १० रुपयापेक्षा कमी भाव मिळाला नाही हे सगळ्यांच्याच हिताचं नाही का ? नाहीतर कॉंग्रेसच्या राजवटीत शेतकऱ्याच्या कांद्याला ५० रुपये किलो भाव मिळाला तसाच कांदा ५ रुपये किलोनेही विकावा लागला. व्यापाऱ्यांनी मात्र कांदा अगदी शंभर रुपये किलोने विकला.   

मी भाजपाचं समर्थन करतोय असेच म्हणतील सगळे. पण वर नमूद केलेली वस्तुस्थिती कुणाला मान्य नाही ? जवळ जवळ मार्च महिन्यापासून मी गावाकडे विजेचा जो काही खेळ चालला आहे तो पहातो आहे. गेली आठ महिने पाणी असून वीज नसल्यामुळे शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही. पाणी असुन केवळ वीज नाही म्हणुन पिके जळून चालली आहेत ? म्हणजे गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या राजवटीला शेतकऱ्यांना वीजेचा पुरवठा करायला जमले नाही. आणि आज अजित पवार दुष्काळी भागाचा दौरा करणार ? कसली ही नौटंकी ? 

पण मात्र या गोष्टीला वैतागलो आहे. नौकरी सोडुन शेती करायला गेलो. तीही साधीसुधी नौकरी नव्हे. प्रोडक्शन म्यानेजर या पदावरची. एका बहुदेशीय स्विडीश कंपनीतली. पाऊस तर कुणाच्याच हातात नाही. ना  शेतकऱ्यांच्या ना विरोधकांच्या आणि ना सत्ताधाऱ्यांच्या. पण वीज पुरवण तरी पुरेशी वीज पुरवणं हे शासनाचं काम नाही का ? कविता कशी जन्म घेते याचं हि कविता एक उत्तम उदाहरण ठरायला हरकत नाही. 
हि कविता वाचल्यानंतर विरोधकांच्या आणि शेतकऱ्याच्या अनुभवातला फरक वाचकांना कळेल.

गेल्या सात आठ महिन्यातल्या वीजेच्या या खेळणे मी पुरता वैतागून गेलो आहे. एकतर वीज पुरवली जाते आठ तास. त्यात ती पाच नसते. जी तीन तास असते त्या वेळात तिचा दाब एवढा कमी असतो कि विचारता सोय नाही. मोटरनं जेवढं पाणी पाटात टाकायला हवं त्याच्या निम्महि पाणी ती फेकत नाही. एक एकर शेताला पाणी दयायला तीन तीन दिवस लागतात. माझा ऊस सहा एकर. कसं पाणी देणार आणि कसा ऊस जिवंत ठेवणार. ट्रान्सफोर्मर जळतात ते वेगळेच. मोटर जळतात ते वेगळंच. स्टार्टर किती खराब होतात ते तर विचारायलाच नको. हे सगळा माहिती आहे उद्धव ठाकरेंना ? हि अशी झळ बसते अजित पवारांना ?  हे असलं काही आमच्या शहरातल्या कवींच्या वाट्याला येतंय ? 

अनेकांना ' कविता कशी जन्माला येते ? ' असा प्रश्न पडतो. मी जे काही लिहिलं आहे ते सारं मी अनुभवलं आहे. त्या अनुभवांची हि कविता - 

      काळ्या आईचीच पोरं 


वीज नाही मोटारीला , मोटं धरावी म्हणतो,
कष्ट सोसवेना आता, बैल गोठ्यात कण्हतो. 

काळ्या आईची मी कशी, सांग भरावी रं वटी,
पावसाचं पोट बघ, पारं लागलंया पाठी. 

काळ्या आईचं हे वारं, पोरं अंगावं घीईना,
काळ्या आईचीच पोरं, काळ्या आईला पीईना. 

पोरं जाता शहरामंदी, रानं होतं म्हातारं,
सोन्यासारख्या मातीचं, पारं होतं रं पोतेरं. 

थोरा मोठयांना विकती, पिकणारी काळी माय, 
दावणीची कसायाला, आणि विकती रं गाय.  

नका दावू रे पोरांनो, काळ्या आईलाच पाठ, 
गावाकडची रे सारे, चला पुन्हा धरा वाट 

पुढल्या वरसाला सारं, मनासारखं होईल, 
म्रीग होउनिया विठु, आणि वक्ताला येईल. 

हि कविता लिहिताना मनात काय काय विचार घोळत होते. ते पुढच्या पोस्टमधे लिहीन. 
  

10 comments:

  1. Kharach mast lihita apan...,.,,he jar saglya paryant pohochal tar mast hoil....copy karun share karu ka.....??

    ReplyDelete
    Replies
    1. राहुलजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपणास उत्तर दयायला उशीर झाल्याबद्दल माफ करा. गेली वीस पंचवीस दिवस गावी शेतावरच होतो. तिथे नेट बीट काही नसतं.

      आपण कोणत्याही मार्गाने कविता इतरांपर्यंत पोहचवू शकता. माझ्या ब्लॉगच्या उजव्या बाजुच्या कॉलम मध्ये सर्वात खाली कोणतीही पोस्ट प्रिंट करा हा पर्याय आहे. तिथे क्लिक करून आपण माझ्या पोस्टची PDF फाईल सुद्धा तयार करून इतरांना पाठवु शकता. अथवा माझ्या पोस्ट खालील M t f या बटनांवर क्लिक करून पोस्ट इतरांना पाठवु शकता

      Delete
  2. pratyek shabdat shetkaryaachya dushkali dahak jivanachi prachiti yete...!!

    ReplyDelete
    Replies
    1. समिधाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. मी पदवीने आणि व्यवसायाने इंजिनिअर असलो तरी जन्माने शेतकरी आहे. आज नौकरी सोडुन शेतीच करतोय. शेतकऱ्यांच्या अडचणी खुप जवळनं पहातोय. त्याचेच प्रतिबिंब कवितेत उमटते.

      Delete
  3. तुम्हाला राजकारणात यायचय का?

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा.

      मित्रा मी राजकारणात येवू इच्छित नाही. मी लेखकच आहे आणि लेखच राहू इच्छितो. समाजाची विचारसरणी बदलावी म्हणुन हि धडपड.

      Delete
  4. प्रीतम मुन्डेना लोकसभेचा सभापती करा. त्यानी मोदीन्च्या मतान्चा विक्रम मागे टाकलाय.

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा.
      प्रीतम मुंडेंना सभापती करायला हरकत नाही. पण मित्रा पण सभापती पद देताना मतांचा विक्रम नव्हे जेष्ठता पाहिली जाते.

      Delete
  5. अगदी मनातलं दु:ख मांडलत...

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल आभार बाबाजी. तुमच्यासारख्या असंख्य वाचकांच्या आणि माझ्या मनात उमटणारे तरंग एकाच असावेत म्हणूनच मी आपया मनातले दुखं मांडू शकलो.

      Delete