Thursday 26 June 2014

Love and wife : बायकोचा भडीमार

आज एका कार्यक्रमाला गेलो होतो. मराठी गाण्यांच्या ” दिवाना झालो तुझा ” या व्ही.सी.डी.चं प्रकाशन होतं. गायक होता ” सा रे ग म ” फेम मंगेश बोरगांवकर. निवेदिका होती सिनेतारका दिप्ती भागवत.

मध्यंतरात बायकोला म्हणालो, ” मी तिला भेटून येतो.”

आपलं मन किती मोठं आहे हे दाखवत तिनं मला परवानगी दिली खरी. पण बाहेर आल्या आल्या खोचकपणे विचारलं, ” भेटली का ?”

” मग काय. ” माझंही तेवढंच खोचक सूर.”

काय म्हणाली ?” तिचा चौकस प्रश्न.


” चहाला या म्हणाली ?” माझं टिपिकल पुणेरी उत्तर.

” कधी जातंय ?” तिनं पार मैदानं बाहेर भिरकावून दिलेला चेंडू.    

” मी सांगितलंय, सध्या वेळ नाही.”

लग्न झालेल्या प्रत्येकाला या प्रश्न उत्तोरांची प्रचिती आलेली असतेच. बायकोनं प्रश्न विचारला नाही असा दिवस उगवण म्हणजे कारल्याच्या वेलीला द्राक्षे येतील असं स्वप्न पाहण्यासारखं आहे. त्यातही तुम्ही एकट्यानं बाहेर कुठे गेलेला असाल तर मग विचारायलाच नको. उंदरावर झेप घेणाऱ्या मांजरीप्रमाणे बायको टपूनच बसलेली असते. अगदी तुम्ही ऑफिसातून आलात तरी तुमची या प्रश्नांच्या सरबत्तीतून सुटका नसते. प्रश्न असे -

” एवढा उशीर का झाला आज ?” ( खरंतर तुम्ही अगदी नेहमीच्या वेळेलाच आलेला असतात.)

” काय केलंत आज ऑफिसात ?” ( आता काय सांगायचं दररोजचा रामायण. )

” नाष्ट्याला काय होता आज ?”

” जेवायला काय होतं ?” ( हा प्रश्न ज्यांच्या ऑफिसात कॅन्टीन असतं त्या घरातला बरं का ! )

ज्यांच्या ऑफिसात कॅन्टीन नसतं आणि जे बायकोनं करून दिलेला टिफिन घेऊन ऑफिसला जातात त्यांच्या पुढचं हे प्रश्नांचं शेपूट तर -

” यानं काय आणलं होतं डब्यात ?”

” त्यानं काय आणलं होतं डब्यात ?”

( या दोन्ही प्रश्नाला तुम्ही दिलेला उत्तर पैकी एका तरी एका तरी उत्तरावर ” बाई, बाई, बाई !!!! काय बायका तरी असतात न एकेक. काहीही देतात डब्याला ” हि तिची प्रतिक्रिया ठरलेली. )

” मी केलेली भाजी आवडली का हो सगळ्यांना ?” असं हनुमानाच्या शेपटीसारखं वाढत जातं.

त्यात तुम्ही पार्टीला गेलेला असाल तर मग विचारूच नका. आधी ती तुमच्याकडं संशयानं पाहिलं. मग तिची घानेन्द्रीये कानोसा घेतील. मग एकेक प्रश्न अंगावर येईल.

” मी सांगितला होतं ना, लवकर या. मग का एवढा उशीर केलात ? “

” कोण कोण आलं होतं पार्टीला ? “

” स्न्यक काय काय होतं ? “

” जेवायला काय काय होतं? ” ( तुमच्या उत्तरावर, ” आई !!! मज्जा आहे बुवा तुमची ” हि तिची प्रतिक्रियाही ठरलेलीच.)

सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना मला काही वाटत नाही. पण -

” काय काय खाल्लंत ? ” या प्रश्नाची फार चीड येते.

मी अगदीच खवय्या नसलो तरी चवीचं खायला का मला नको असतं !!! पण त्याविषयी मिटक्या मारत भरभरून बोलायचं म्हणजे मला फारच अवघड वाटतं. अशा विषयावर बोलणारी माणसं पहिली की वाटतं हि माणसं काय फक्त खाण्या – पिण्यासाठीच जन्माला आली आहेत काय ?

जाता जाता बायकांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. तुमच्यावर अशी प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या बायकोला तुम्ही एखादा प्रश्न विचारून पहा ……….आहो खरंतर प्रश्न विचारायचीही गरज नसते. ती अशी कुठून बाहेरून आली कि ब्रेक नसलेली गाडी उतारावरून सुटावी तशी ती निव्वळ बोलत सुटते. आणि आपल्याला ऊर दडपून गेल्यासारखं वाटतं.

No comments:

Post a Comment