Friday 19 September 2014

Shiv sena, BJP, Congress : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?

अर्ज भरण्याचे दिवस जवळ आलेत. आणि अजूनही युतीच्या जागा वाटपाच कोडं सुटलं नाही. राजेशाही थाटात उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुका झाल्यापासून भाजपावर दबाव टाकायला सुरवात केली होती. आणि भाजपानं निम्म्या जागांवर दावा सांगण्या अगोदर पासून शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगायला सुरवात केली होती. पण आता युती शेवटचा आचका देत असताना उद्धव ठाकरे काढा घ्यायला तयार होतील असं दिसतय. पण का आणि कोणत्या अटीवर ते पाहू.


शिवसेना माघार का घेईल -  

१ ) आपण कायम भाजपापेक्षा जास्त जागा लढवूनही आणि आपण स्थानिक पक्ष असुनही आपल्या विजयाची टक्केवारी कायम भाजपापेक्षा कमी आहे.

२ ) बाळासाहेब ठाकरेंनी राजला बाजूला सारून उद्धव ठाकरेंचं बस्तान बसवून दिलं. आता उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंसाठी बेगमी करून ठेवायची आहे. आज आपण माघार घेतली नाही आणि अपयश पदरी पडलं तर तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी आपली अवस्था होईल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

३) लोकसभेच्या निवडणुकीत लाट होती ती केवळ मोदींची. बाळासाहेबांच्या स्वर्गवासाला वर्षच झालं होतं. आणि त्यांच्या निधनाच्या सहानभूतीचा फायदा शिवसेनेला घेता आला असता. पण मोदी लाटेमुळे तसा फायदा घेण्याची मुळीसुद्धा गरज भासली नाही. आणि लोकसभेच्या संपूर्ण प्रचारादरम्यान बाळासाहेबांचा नामोल्लेख करण्याचीही गरज पडली नाही.

४ ) आज माघार घेतली नाही आणि त्यामुळे आघाडीची सत्ता आली तर पुढच्या पाच वर्षात शिवसेनेचा प्रभाव किती टिकेल याविषयी उद्धव ठाकरेंनाच शंका असतील.

त्यामुळेच हा काढा घेऊन युती टिकविण्यात शिवसेनेचाच फायदा असेल. पण युती टिकवताना या अंतिम टप्प्यात उद्धव ठाकरे कोणत्या चाली खेळू शकतील ? माघार घेतील पण कुठल्या मुद्द्यावर घेतील त्याचा आढावा. 

१ ) शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जागा जास्त आल्या ( ज्या येणार याची उद्धव ठाकरेंना पूर्ण जाणीव आहे ) तरी स्थानिक पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर शिवसेना हक्क सांगेल.

या आतील भाजपची नक्की सहमती असेल पण तरीही भाजपा अडीच अडीच वर्षाचं सूत्र मांडेल. त्यानुसार पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री तर भाजपचा उपमुख्यमंत्री आणि नंतरची अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री तर शिवसेनेचा उपमुख्यमंत्री राहील.

२ ) भाजपाच्या हमखास निवडून येणाऱ्या जागांपैकी ८ ते ८ जागा शिवसेना स्वतःकडे मागेल. ज्यामुळे शिवसेनेचे तिथले आमदार नक्की निवडून येतील आणि या जागा आपल्या पदरात पडून घेतल्या कि त्या कायम स्वरूपी आपल्याकडेच ठेवण्याची व्यूहरचना शिवसेना आखेल.

भाजपाची याही गोष्टीला सहमती असेल. कारण भाजपाचा आत्मविश्वास कमालीचा आहे. आणि आपण कुठलीही जागा निवडून आणू शकतो याचा त्यांना विश्वास आहे.

३ )  या बरोबरच काही महत्वाची खातीही आपल्याला मिळवीत असा आग्रह उद्धव ठाकरे आजपासूनच लावून धरतील. कारण अनंत गीतेंना देण्यात आलेल्या खात्याचं चित्रं आजही त्यांच्या डोळ्यापुढे असेल.

काही असो. पण आज नाही तर उदया शिवसेना माघार घेईल आणि त्यात फायदा शिवसेनेचाच असेल.

 

6 comments:

  1. शिवसेना मुळीच माघार घेणार नाही . जय भवानी जय शिवाजी.

    ReplyDelete
  2. शिवसेनेने माघार घेतली नाही तर नुकसान युतीच होईलच पण त्यापेक्षा अधिक नुकसान शिवसेनेच होईल.

    ReplyDelete
  3. पाच दिवसांपूर्वीच तुमचं भाष्य तंतोतंत बरोबर ठरलंय. पण हा माणूस घटक पक्षांची गळचेपी करू शकेल याचा अंदाज तुम्हालाही आला नाही.

    ReplyDelete
  4. उद्धव ठाकरे मित्रं पक्षांची अशी गळचेपी करतील असा अंदाज मला खरंच नव्हता. कारण अशा रितेने मित्रांचे गळे कापण्याची वृत्ती आपल्याकडे नसते. हा माणुस मित्राच्या पाठीत असा खंजीर खुपसतो तर सत्ता हाती आली तर जनतेचं काय करेल.

    ReplyDelete
  5. उद्धव ठाकरे मित्रं पक्षांची अशी गळचेपी करतील असा अंदाज मला खरंच नव्हता. कारण अशा रितेने मित्रांचे गळे कापण्याची वृत्ती आपल्याकडे नसते. हा माणुस मित्राच्या पाठीत असा खंजीर खुपसतो तर सत्ता हाती आली तर जनतेचं काय करेल.

    ReplyDelete
  6. उद्धव ठाकरे मित्रं पक्षांची अशी गळचेपी करतील असा अंदाज मला खरंच नव्हता. कारण अशा रितेने मित्रांचे गळे कापण्याची वृत्ती आपल्याकडे नसते. हा माणुस मित्राच्या पाठीत असा खंजीर खुपसतो तर सत्ता हाती आली तर जनतेचं काय करेल.

    ReplyDelete