Tuesday 17 June 2014

social media and sex : जागरण गोंधळ का घालतात ? कथा १

मुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिचा स्ट्यामिना नक्कीच कौतुकास्पद असतो. तिच्या नृत्याची झलक एकवार पहाण्यासाठी खालील तीन चार मिनिटांचा व्हिडीओ एकवार नक्कीच पहायला हवा.

हिंदू समाजात आणि त्यातही जेजुरीचा खंडोबा हे ज्यांचं आराध्य दैवत आहे त्यांच्यात जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे. पण जागरण गोंधळ का घालतात ?  किंवा का घालावं ? हे मात्रं बऱ्याच मंडळींना माहित नसतं.


जागरण गोंधळ या कार्यक्रमात चावटपणा असला तरी तो लोकांच्या पचनी पडला आहे. सर्वसाधारणपणे घरात नवीन विवाह पार पडल्यानंतर जागरण गोंधळ घालतात. पण का ?

परवा आमच्या मामाच्या मुलाचं लग्न झालं. रितीप्रमाणे देवदेव, पूजाअर्चा सारं पार पडलं. सरतेशेवटी जागरण गोंधळ घालायचं ठरलं होतं. बेलवंडी कोठारची जागरण गोंधळ पार्टी बोलावली होती. पाच सहा जणांचा ताफा. संजय बापूराव शिंदे हे त्या पार्टीचे प्रमुख.

मधे मधे थोडा ब्रेक असायचा. त्या वेळी मी संजय शिंदेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझ्या काही शंकांचं समाधान करून घेतलं. जागरण गोंधळ का घालतात ? हेही त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं ते असं.

एका बाजूला आहे तो खंडोबा. दुसऱ्या बाजूला आई तुळजाभवानी. आज रात्रभर आपण देवाची आराधना करतो. त्याला प्रसन्न करुन. आपल्यावरची इडापिडा टळून जाऊदे म्हणून देवाला साकडं घालतो. दिवस उगवताना जेव्हा आपण लंगर तोडतो तेव्हा आपण आपल्यावरील साऱ्या आरिष्ट्यातन मुक्त झालेलो असतो.

" मग हि आरिष्ट कुठं जातात ? "   माझा प्रश्न.

नवरात्रात जशी नऊ दिवस अहोरात्र समई जळत असते तशी जागरण गोंधळ सुरु असताना रात्रभर दिवटी जळत असते. या दिवटीला रात्रभर तेल घालावं लागतं. हे तेल घालण्याचं काम पाहुण्या माणसाचं असतं. या पूजेत एक दैत्यही असतो. दिवटीला तेल घालणाऱ्या पाहुण्याला दिवटीला तेल घालता या दैत्यावरही लक्ष ठेवायचं असतं. आपल्यावरच सारं आरिष्ट हे त्या दैत्याच्या मानेवर जाऊन बसतं. 

" दिवटीला रात्रभर तेल घालून तेवत का ठेवतात ? " माझा बाळबोध प्रश्न.


दिवटी विझली तर अंधार होईल आणि या अंधाराचा फायदा घेऊन दैत्य पळून जाईल. दैत्य पळून गेला तर आपल्यावरची सारी आरिष्ट हि त्या पाहुण्या माणसाच्या मानेवर जाऊन बसतात. आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या पाहुण्यालाही लवकरच जागरण गोंधळ घालावं लागतं.

" लंगर का तोडतात ? " माझं कुतूहल.

( बऱ्याच जणांना माहिती असेल. तरीही इथं आधी मी लंगर म्हणजे काय ते सांगतो. लंगर हि अनेक लोखंडी कड्यांची साखळी असते. ती एका बाजूला पहार ठोकून त्यात अडकवलेली असते. या साखळीत एक खास कडी असते. तीच कडी तुटते. परवाच्या मामांच्या मुलाच्या जागरणात मी पाहिलेला लंगर अगदीच हलका होता. कारण माझ्या लग्नानंतर घातलेल्या जागरण गोंधळातला लंगर मला अजुनही आठवतोय. दहा बारा किलोचा तो लंगर मी हिसका तोडला आणि त्याची साखळी खाडकन माझ्या कपाळा लागली होती. )

नवरदेवाला खंडोबाचा अवतार मानतात. तर नवरीला बानूचा. नवरदेव हा खंडोबाचा अवतार आहे दैत्याला दाखवून देण्यासाठी लंगर तोडावा लागतो. नवरदेवाला लंगर तोडण्यास जमले नाही तर नव्या नवरा नवरीच्या आयुष्यावर कायम दैत्याची छाया राहते.

मला आणखी एक मजेशीर कथा माहित आहे. ती पुढच्या भागात.

      
 

2 comments:

  1. He kahich mahit navhate. Thanks for information.

    ReplyDelete
  2. Thanks. I am continuing to write on this subject. Go on reading. You response is inspiration. So pl keep responding.

    ReplyDelete