Thursday 5 June 2014

Mrathi Poem : मला झाड व्हायचं

पर्यावरण दिन नव्हे पर्यावरण चिरायू होवो.

माझी मोर आणि लांडोर हि कविता रसिकांना खुप आवडली होती. खरंतर कविता नव्हतीच ती चारोळीच होती. पण तरीही एकाच दिवसात ३०० हुन अधिक रसिकांनी हि कविता वाचली होती. कारण स्त्री पुरुषांना परस्परांविषयी वाटणाऱ्या आकर्षणावर या चारोळीतून अत्यंत चपखल भाष्य करण्यात मी यशस्वी झालो होतो.

मोर आणि लांडोर या कविते एवढीच मला माझी " मला झाड व्हायचं " हि कविताही आवडते.
तुम्ही म्हणाल, " त्यात काय एवढ ! तुम्हाला तुमची प्रत्येक कविताच आवडत असणार." नाही मित्रानो.

माझ्या काही कविता मलाच आवडतही नाहीत. त्या कविता मला हव्या तशा साधलेल्या नसतात. लिहिण्याच्या ओघात लिहिल्या गेलेल्या असतात. 


या जन्मानंतर पुढचा जन्म हा फेरा मी मानतो. पुढल्या जन्मी आपण कुठल्या जन्माला जाऊ याची विवंचना प्रत्येकाला असते. आणि मला अमुक एका जन्माला पाठवू नकोस अशी विनंतीही याच जन्मी अनेकजण देवाला करत असतात.

एक दिवस ' पुढल्या जन्मी कुठल्या जन्माला जावं ? '  असा प्रश्न माझ्याही मनात आला. त्याचं मलाच मिळालेलं उत्तर म्हणजे पुढल्या जन्मी आपण झाडाच्या जन्माला जावं.

एक दिवस आमच्या घरी भली थोरली पूजा घालायला एक गुरुजी आले होते. चांगलेच प्रगाढ पंडित होते. पूजा वगेरे आटोपली.गुरुजी जायला निघाले. मीही त्यांना फाटकापर्यंत सोडवायला म्हणून निघालो. मन स्वस्थ बसू देईना. मी हळूच गुरुजींना म्हणालो," गुरुजी, आपण आपल्या शास्त्रानुसार पुनर्जन्म मानतो."

"हो बरोबर. अहो मानतो म्हणजे काय ? होतोच पुनर्जन्म आपला. " गुरुजी अगदी टिपिकल अनुनासिक स्वरात म्हणाले.

" मग गुरुजी असं असेल तर पुढल्या जन्मी मी देवाला मला झाडाच्या जन्माला घालायला सांगणार आहे. " मी अभिमानानं म्हणालो.

" अहो ! वेडे कि खुळे तुम्ही ? झाडाचा जन्म कसला मागताय ? किती वेदना असतात झाडाच्या जीवाला याची काही जाणीव आहे का तुम्हाला ? कुणीही यावं फांदी तोडावी.....कुणीही यावं कुऱ्हाड चालवावी. पराधीन ....पराधीन जन्म हो झाडाचा. त्यापेक्षा मनुष्य प्राण्याचाच जन्म मागा ना पुन्हा. अहो पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म लाभायलाही फार भाग्य लागतं..... फार मोठी पुण्याई असावी लागते त्यासाठी गाठीशी." साठी उलटलेले गुरुजी फार कळकळीने सांगत होते.

किव करावीशी वाटली मला त्यांच्या पांडित्याची. एवढे उन्हाळे , पावसाळे पाहूनही यांना मनुष्य जन्माच्या दशा कळल्या नाहीत.

अरे ! काय सुख आहे या मानवी जन्मात ? स्वार्थ, लोभ, मोह, मत्सर अशा किती तरी अवगुणांनी हा मानवी जन्म पोखरलेला आहे. काय सुख देतो मनुष्य दुसऱ्याला ? त्यापेक्षा झाडाचा जन्म बरा. कुणासाठी चारा व्हावं, कुणासाठी सावली व्हावं. जर नाहीच उरलं देहात काही तर चुलीमधल सरपण व्हावं. पण कुणाला छळू नये........कशाचा लोभ धरू नये. कुणाचा मत्सर करू नये.

होय मला असंच आयुष्य जगायचंय..........म्हणूनच मला झाड व्हायचंय.............मला झाड व्हायचंय.

2 comments:

  1. विजय सर
    खुपच सुंदर ब्लॉग आहे
    आणि ही पोस्ट

    ReplyDelete
    Replies
    1. माफ करा चिंतामणीजी, पण त्यावेळी यात मुळ कविता पोस्ट करायचीच राहिली आहे. पोस्ट तुम्हाला आवडली आहेचफ़ाण कविताही आवडेल. लवकरच ती कविताही पोस्ट करेन. आपल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार.

      Delete