Tuesday 7 July 2020

ऑगस्टमध्ये ठाकरे सरकार गडगडणार?

cartoon by vijay shendge

काल मी 'शिवसेनेचा धोबीका कुत्ता होणार' हा लेख लिहिला आणि रात्री मीडियावर, 'ऑगस्टमध्ये ठाकरे सरकार गडगडणार.' अशी बातमी झळकताना दिसली. आज सगळ्या वर्तमानपत्रातही तोच मथळा आहे. संजय
राऊतांनी, 'आमचे सरकार पाडण्यासाठी पैजा लावल्या जात आहेत.' असे म्हणत भाजपवर चिखलफेक केली. तरीही 'सगळे काही अलबेल असून कोणीही काहीही केले तरी आमचे सरकार पडणार नाही' असे ठिगळ लावायला संजय राऊत विसरले नाहीत. असे काहीही असले तरी 'खरंच काय होणार आहे ऑगस्टमध्ये? खरंच ठाकरे सरकार गडगडणार आहे का?'

खरंतर तर हि अभद्र आज ना उद्या मोडीत निघणार, हे जनतेलाही माहित आहे. का ते सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय अभ्यासकाची, राजकीय विश्लेषकाची गरज नाही. हे सरकार पडण्यासाठी भाजपला काहीही हालचाल करावी लागणार नाही. मांजर उंदराशी फार वेळ खेळू शकत नाही . भूक लागल्यावर तिला उंदीर खावाच लागतो हे सगळ्यांना माहित आहे. अवकाळी आलेला मोहर फुलत नाही. त्याला फळ लागत नाही. त्या मोहरला हवेची  झुळक सोसत नाही. रिमझिम पावसाची सरही त्या मोहरला बाधत असते. आणि मग अवेळी लागलेला मोहर गळून पडतो. पण जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा शिवसेना भाजपच्या नावानेच बोटं मोडेल हे नक्की. परंतु आपलं सरकार पडणं हे आपल्या कर्माचं फळ आहे याची शिवसेनेला जाणीव असणार आहे. 

दोन एक महिन्यापूर्वी, 'शरद पवार मुख्यमंत्री होणार, सुप्रिया केंद्रात जाणार, भाजप राष्ट्रवादी युती होणार.' अशा मथळ्याची बातमी एका दुय्यम दैनिकाच्या मुखपृष्ठावर झळकली होती. तेव्हा 'सरकार पडेल पण भाजप-राष्ट्रवादी युती अशक्य' असं मला वाटत होतं. महिन्यापूर्वी अगदी खात्रीशीर गोटातून भाजप राष्ट्रवादी युती होणार असल्याची बातमी माझ्या कानावर आली. जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी, ज्या पक्षासोबत मोट बांधली आहे त्यांना भीती दाखविण्यासाठी 'राजकारणात अशा बातम्या पेराव्या लागतात' असे म्हणत मी ती शक्यता फेटाळून लावली होती. कारण भाजप राष्ट्रवादी युती अशक्य असा माझा कयास होता. 

काल बातम्या झळकल्या. त्यात मुख्यमंत्री कोण होणार? सुप्रिया केंद्रात जाणार कि नाही? या विषयी काहीही भाष्य केलेलं नव्हतं. परंतु महाविकास आघाडीचं  सरकार ऑगस्टमध्ये पडणार असे सांगत वेगवेगळ्या राजकीय शक्यता आणि गणिते मांडली जात होती. तेव्हा त्या बाबतीत मी नव्याने विचार केला. खरंच भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते का? भाजप राष्ट्रवादी एकत्र आली तर तो भाजपचा राजकीय कडेलोट ठरेल का? संजय राऊत आणि शिवसेनेला शिमगा करायला निमित्त मिळेल का? राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर मुख्यमंत्री शरद पवार होणार कि फडणवीस? नसानसात राजकीय धुर्तपणा असलेले शरद पवार खरंच शिवसेनेचा पाठींबा काढून घेतील का? हे विजय वट्टीवारांचे आणि सारथीचे प्रकरण काय आहे? महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला जाईल का? गेली तर का जाईल? बरं भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार, राहिलेला चार सव्वाचार वर्षाचा कालावधी पूर्ण करेल का? केला तर का करेल? असा सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच्या 'साहेबांना काँग्रेस संपवायची आहे' या लेखात.     

No comments:

Post a Comment