Thursday 2 July 2020

तुम्हाला बुक्क्याचा भार सोसेना


साहेब फार तोऱ्यात तुम्ही मुख्यमंत्री झालात. आपल्याशिवाय महाराष्ट्रातल्या जनतेचा दुसरा कोणी तारणहार नाही असाच अविर्भाव होता तुमचा. पण जनतेला मात्र
राज्य चुकीच्या माणसाच्या घशात गेलं आहे याची जाणीव होती. पण एकदा मत दिलं कि जनतेच्या हातात तुम्ही केलेला खेळ बघण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही. जनकल्याणचे कोणते दोन निर्णय तुम्ही घेतले हे तुमचे समर्थक नाहीच सांगू शकणार पण तुम्ही तरी सांगू शकाल का?

कोरोना सुरु झाला आणि दर दोनचार दिवसांनी जनतेसमोर येऊन तुम्ही भाषणे ठोकू लागला. परंतु भाषणे ठोकणं, दसऱ्याचा मेळावा घेणं आणि राज्य चालवणं यात फार फरक आहे हो तुम्ही. छत्रपतींच नाव घेऊन तुम्ही जनतेची दिशाभूल केलीत. आता तुम्हाला छत्रपती सुद्धा माफ करणार नाहीत आणि स्वर्गीय बाळासाहेब सुद्धा ठोकर मारतील.  

डॉक्टरांवर, पोलिसांवर, नर्सवर हल्ले करणाऱ्या गुंडांवर गुन्हे नाही, अनंत करमुसेला बेदम मारहाण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडवर गुन्हा नाही, पालघरमध्ये साधूंवर हल्ला करणाऱ्या नराधमांवर गुन्हा नाही. परंतु अजानचा आवाज कमी करा सांगणाऱ्या करिष्मा भोसलेला गुन्हा दाखल करण्याची नोटीस पाठवणार. आपल्या सोसायटीत, आपल्या घरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करणार. सामान्य नागरिकांच्या गाड्या जप्त करणार. गरिबांना अन्नपुरवठा करणार केंद्र सरकार. तुम्ही मात्र राज्यातल्या तळीरामांना दारू घरपोच देणार. व्वा. केवढी हि जनसेवा.               

कोरोना BCG लसीचा मार्ग सुचवणारे तुम्ही. त्यासाठी केंद्राकडे परवानगी मागणारे तुम्ही. जगाला दिशा दाखवायला निघाला होतात. ३१ मेच्या आत महाराष्ट्र ग्रीन झोन  मध्ये आणण्याचा तुम्ही संकल्प सोडला सोडला होतात. आज काय अवस्था आहे? गेली काही दिवस रुग्ण संख्या ५००० ने रोज वाढते. कुठे आहे तुमचं नियंत्रण? लोकांना वीजबिल डबल टिबल येतंय, शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा पुरवठा होतोय. लोकांच्या गाड्या जप्त केल्या जाताहेत, भ्रष्टाचाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत जी एसटी दिले जाते त्याचे ७०००० हजार रुपये घेतले जातात. आणि जनतेसमोर पितळ उघडं पडतं तेव्हा अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो. परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. कोरोना आटोक्यात येत नाही आणि तुम्हाला शाळा सुरु करायची घाई झाली आहे? कुणाचं भलं करताय आणि कुणाचे तळतळाट घेताय? 

तुमचं नियोजन उघडलं पडतं, कोरोना रुग्णाची संख्या आवक्यात येत नाही तेव्हा तुम्ही विठ्ठलाच्या खांद्यावर भार टाकता. तुमच्या कपाळावर बुक्का दिसला नाही. का हो? बहुदा बुक्क्याचा भार तुम्हाला सोसत नसावा. आणि तुम्हाला पांडुरंगाच्या बुक्क्याचा भार सोसत नसताना, विठ्ठलाने तुमच्या पापाचा भार त्याच्या खांद्यावर का घ्यावा? 

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

      Delete